राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) संदर्भात चर्चेत असलेल्या वादांवर प्रतिक्रिया दिली आहे. “ईव्हीएममध्ये गडबड असती, तर जरांगे किंवा अन्य कोणीही उलटसुलट फेरफार करून मला दीड ते दोन लाख मताधिक्य मिळवून दिले असते. मात्र, असे झाले नाही. त्यामुळे मी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा दावा कसा करू?” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांनी मॉक पोलबाबतही माहिती नसल्याचे सांगितले आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर दिले. “मी पूर्वीही ६० हजार मताधिक्याने निवडून येत होतो. मात्र, यावेळी जरांगे यांच्या प्रभावामुळे माझे मताधिक्य कमी झाले,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भुजबळांचे मत
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादीतून विरोध झाल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “माझ्याकडे याबाबत ठोस माहिती नाही, मात्र मी असे ऐकले आहे की, मंत्रिमंडळात अनेक वरिष्ठ नेते होते आणि त्यावेळी शिंदे हे तुलनेने कनिष्ठ होते. त्यामुळे, तेव्हा वरिष्ठ नेतृत्वाची गरज भासली असावी.”
आमदारांच्या सुरक्षेबाबतही त्यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, “मी मंत्रिमंडळाचा भाग नाही, त्यामुळे याबाबत काही कल्पना नाही. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर चौकशी करून निर्णय घेतील.”
छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ईव्हीएम संदर्भातील चर्चांना वेगळा सूर मिळाला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीच्या भूमिकेवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आता या मुद्द्यावर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुढील काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.