मुंबई – स्वप्ननगरी मुंबईत अनेक विविध भाषिक आणि सांस्कृतिक लोक राहतात. प्रत्येकाचा राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी या त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र अलीकडे, मुंबईत या विषयावरून तणाव वाढताना दिसतो आहे. नुकतीच घाटकोपरमधील एका सोसायटीत घडलेली घटना याचे ताजे उदाहरण ठरली आहे.

घाटकोपरमधील एका सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबाला त्यांच्या मांसाहारी जीवनशैलीमुळे अपमानास्पद वागणूक मिळाल्याची तक्रार पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या सोसायटीत प्रामुख्याने गुजराती, जैन आणि मारवाडी कुटुंबे वास्तव्यास आहेत. आरोपानुसार, शाह नावाच्या व्यक्तीने मराठी कुटुंबाला उद्देशून “तुम मराठी लोक घाणेरडे आहात, मच्छी-मटण खाता,” अशी अपमानजनक भाषा वापरली. यामुळे मराठी कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला.
ही बाब समोर येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश पार्टे यांनी सोसायटीत जाऊन संबंधित सदस्यांना खडसावले आणि मराठी कुटुंबाचा अपमान का केला गेला याचा जाब विचारला. मात्र, अपमान करणारी व्यक्ती समोर येण्यास टाळाटाळ करताना दिसली. सोसायटीतील इतर सदस्यांनी या प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही कोणताही भेदभाव करत नाही, असे सांगितले.
या घटनेमुळे घाटकोपरमधील मराठी विरुद्ध अमराठी हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी “मुंबईत येणाऱ्यांना मराठी शिकणे बंधनकारक नाही” असे वादग्रस्त विधान केल्याने वातावरण आधीच तापले होते. त्यातच आता या प्रकारामुळे संतापाची लाट उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजेश पार्टे यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत जोरदार संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, “घाटकोपरमध्ये आम्ही मराठी माणसासाठी दररोज संघर्ष करतोय. चार मराठी कुटुंबे आणि संपूर्ण सोसायटी गुजराती. रोज अपमान, खालच्या दर्जाची भाषा आणि छळ सहन करावा लागतोय. अखेर आज आम्ही धडक दिली.”
मुंबईत वाढत चाललेला हा मराठी लोकांविरोधातील तिरस्कार आणि भेदभाव हा अत्यंत चिंताजनक विषय आहे. सर्व जाती, धर्म आणि भाषिक लोकांनी एकमेकांचा आदर राखत शांततेने सहजीवन जगावे, अशी अपेक्षा आहे. अन्यथा, या प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक सलोख्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल.