बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अडीच महिने उलटले तरीही सर्व आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. काही आरोपी फरार आहेत, तर एका आरोपीला विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग गावात भेट देत देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबीयांनी सुरू असलेल्या तपासाच्या मंद गतीवर नाराजी व्यक्त केली.
“मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला, तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईन, हा माझा शब्द आहे,” असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाला दिले.
गावकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खरोखर माफ करा, पण मी वचन देते की हा विषय मी सरकारदरबारी नेईन आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन.”
या भेटीनंतर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाला या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याची मागणी केली.