कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यामुळे त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात कामराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान कामराच्या वकिलांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

कामराच्या वकिलांनी युक्तिवाद करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटलं की, एका कलाकाराच्या अभिव्यक्तीवर बंदी घालणं हे लोकशाहीच्या तत्वांना बाधा पोहोचवणारं आहे. वकिलांनी असा आरोपही केला की, सरकारी यंत्रणा वापरून निवडक व्यक्तींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यासोबतच त्यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीवर प्रश्न उपस्थित केला. “ज्या गोष्टीचा उल्लेख गाण्यात करण्यात आला, त्या ऐतिहासिक घडामोडी आहेत. या बाबतीत ना शिंदेंनी स्वतः काही तक्रार केली, ना त्यांच्याविरोधात थेट बदनामीचे शब्द वापरण्यात आले,” असं वकिलांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, एफआयआर दाखल करताना प्राथमिक चौकशीसुद्धा झाली नाही, हे लक्षवेधी आहे.
कामराच्या बाजूने आणखी एक मुद्दा मांडताना वकिलांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या जुना विधानांचा उल्लेख केला. “2024 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ म्हटलं होतं. त्याचप्रमाणे अजित पवारांनीही असाच उल्लेख केला होता. मग त्यांच्यावर गुन्हा का नाही?” असा सवाल त्यांनी कोर्टात विचारला.
या प्रकरणामुळे कामराला अनेक धमक्या मिळाल्या असून, कार्यक्रम जिथे झाला त्या स्टुडिओचा काही भाग तोडण्यात आल्याचेही वकिलांनी निदर्शनास आणले. “कामराला 500 हून अधिक धमक्या आल्या आहेत, काही नेत्यांनी सोशल मीडियावर खुलेआम त्याच्याविरोधात वक्तव्य केलं आहे,” असा दावा त्यांनी केला. शिवाय, पोलिसांनी कामराला थेट पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलं असून, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जबाब नोंदवण्याची त्याची तयारी असूनही, ती मान्य केली जात नाही, असंही नमूद केलं.
“आमच्यावर टीका झाली तर सहन होत नाही, पण एखाद्याने मत मांडली की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा? हा कायद्याचा गैरवापर आहे,” असं स्पष्ट करत कामराच्या वकिलांनी त्याला अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली.