औरंगजेबाच्या प्रशासन कौशल्यावर गौरवोद्गार काढल्यानंतर टीकेच्या झोडप्यात सापडलेले अबू आझमी आता त्यांच्या वक्तव्यावर माघार घेताना दिसत आहेत.

“वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले” – आझमी
अबू आझमी यांनी स्पष्ट केले की, “मी कोणत्याही महापुरुषांचा अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज यांचा आम्ही सदैव आदर करतो.”
त्यांनी असेही नमूद केले की, “माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आणि कुणालाही दुखावले गेले असेल, तर मी माझे विधान मागे घेतो.”
कालच औरंगजेबाच्या प्रशंसेने वाद निर्माण
कालच अबू आझमी यांनी “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता आणि त्याने मंदिरे बांधली” असा दावा केला होता. तसेच, “संभाजी महाराज यांनी धर्मासाठी लढाया लढल्या नाहीत” असे विधान केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
भाजपकडून जोरदार टीका
या विधानावर भाजपने जोरदार टीका करत “ही ऐतिहासिक चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न आहे” असे म्हटले होते. भाजप आमदार महेश लांडगे यांनी आझमींवर टीका करत, “संभाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही” असा इशारा दिला होता.
विवादावर पडदा?
टीकेची झोड वाढत असल्याने अबू आझमींनी यु-टर्न घेत “मी इतिहासकारांच्या पुस्तकावरून बोललो. कुणी दुखावले गेले असेल, तर मी विधान मागे घेतो.” असे सांगितले.
या माघारीनंतर वाद थांबतो का, की आणखी राजकीय उलथापालथ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.