गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण झाला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. गुढी पाडवा मेळाव्यात त्यांनी या विषयावर भाष्य करत स्पष्ट भूमिका मांडली.

राज ठाकरे म्हणाले, “मराठ्यांचा नाश करण्यासाठी आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला, याबाबत जनतेला माहिती असायला हवी. त्यासाठी त्या कबरीजवळ मोठा बोर्ड लावला जावा आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना इथे सहलीसाठी आणले जावे, जेणेकरून त्यांना खरी ऐतिहासिक पार्श्वभूमी कळेल.”
पुढे बोलताना त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून देखील रोखठोक मत मांडले. “सिनेमांनी प्रभावित होणारा हिंदू समाज काहीच उपयोगाचा नाही. संभाजी राजेंच्या बलिदानाची जाणीव आता तरी होईल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी जागतिक पातळीवर औरंगजेबाचे कृत्य कसे ओळखले जाते, यावरही भाष्य केले. “जगभरातील लोकांना माहीत आहे की औरंगजेब कशासाठी आला आणि कसा मेला. त्यामुळे ही कबर सुशोभित करण्याऐवजी ती साधी ठेवली जावी. त्यावर मोठा फलक लावून खरा इतिहास सांगितला पाहिजे,” असे ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष आणि इतर नेतेमंडळी यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.