महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकनाथ शिंदे यांच्या “ऑपरेशन टायगर”ची चर्चा रंगली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना कोकणातील ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांना शिंदे गटाने ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.

कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हे शिंदे गटाच्या रडारवर आहेत. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी जाधव यांना खुलेआम आमंत्रण दिले आहे. तसेच, शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनीही वैभव नाईक यांच्यावरून हालचाली सुरू असल्याचा दावा केला आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची रणनीती
याआधी शिंदे गटाने राजन साळवी आणि सुभाष बने या माजी आमदारांना आपल्याकडे वळवले आहे. विशेष म्हणजे, राजन साळवी यांच्यावर एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) चौकशीचा ससेमीरा होता. त्यांनी उद्धव ठाकरेंना भेटून काही वेळ काढला, मात्र शेवटी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच, वैभव नाईक यांचीही एसीबी चौकशी झाली होती, त्यानंतर ते मातोश्रीवर गेले, पण त्यांनी ठाकरे गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाकरे गटाचा डॅमेज कंट्रोल
शिंदे गटाच्या या हालचालींना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. त्यांनी 20 फेब्रुवारीला खासदारांची आणि 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक बोलावली आहे. कोकणात 100% शिवसेना शिंदे गटाची असेल, अशी रणनीती आखण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद कोकणात घटणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.