राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला. “सगळ्यांनी तोलून-मापून बोललं पाहिजे. कोणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही आणि चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

यासोबतच, सत्कार आणि स्वागताच्या कार्यक्रमांबाबतही त्यांनी मिश्कील टिपणी केली. “कोणीतरी काहीतरी खाल्लं की कचरा तिथेच टाकला जातो. हार आणला की त्याची पिशवी खाली टाकली जाते, आणि मीच ती उचलतो. त्यामुळे मला बघितलं की, ‘राहू द्या दादा’, असा विचार करा. मला शाली, हार नकोत, टोप्या नकोत – नुसता प्रेमाचा नमस्कार पुरेसा आहे,” असे ते हसत म्हणाले.
यावेळी त्यांनी मोठ्या हारांबाबतही गंमतीशीर टिप्पणी केली. “जेवढा मोठा हार, तेवढी भीती वाटते! त्यामुळे त्या हाराचा बोजा वाटतो,” असे म्हणत त्यांनी हलक्या फुलक्या शैलीत उपस्थितांना संबोधले. तसेच, “आई-बाबांच्या आणि चुलत्याच्या कृपेने आमचं चांगलं चाललंय,” असे सूचक वक्तव्य करून त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावल्याचेही दिसून आले.